दैव - भाग ३

निख्या...

किती दिवसांनी हा शब्द वाचला, पाहिला... अनुभवला. एके काळी माझं अवघं विश्व या एका शब्दात एकवटलं होतं रे. मोठी आई गेल्यानंतर बाबांनी दुसरे लग्न करून तिला घरात आणलं आणि त्यांच्याशी जवळ जवळ बोलणंच संपलं होतं. तिच्याशी बोलण्याचा तर प्रश्नच नव्हता. अशात तू भेटलास आणि 'निख्या' हे माझ्यासाठी सर्वस्व बनून गेलं. तरीही गेल्या ८-९ वर्षात मी तुझ्याशी कसलाच संपर्क नाही ठेवला. का झाले असेल असे? माझ्या एकुलत्या एक मित्रापासून असे दूर का राहावे वाटले मला? खरं सांगू निख्या, पण मला कसलीतरी भीती वाटत होती रे.........

भीती..........?

चल, ते बोलावताहेत. बाकीचे पुढच्या पत्रात...........!

तुझे बाबा कसे आहेत?

तुझाच...,
चेत्या
*******************************************************************************************
प्रिय चेतन

तुझ्या नुकत्याच मिळालेल्या अतिशय त्रोटक अशा या पत्रामुळे मी अजूनच गोंधळात किंबहुना काळजीत पडलो आहे रे. तुझं पहिलं पत्र बरंचसं सुसंबद्ध वाटतंय. पण या पत्रात .....

एकतर आधीच अवघ्या चार-पाच ओळी लिहिल्या आहेस. त्याही अर्धवट, घाई-घाईत खरडल्यासारख्या वाटताहेत. ते बोलावताहे....यातले 'ते' म्हणजे कोण रे राजा? मला आठवतं एकदा लहानपणी आपण दोघे काहीतरी बोलत असताना त्या राजमाने बाईंनी तुला हाक मारली. तू तसाच माझ्याशी बोलत राहिलास. बाई चिडून तुझ्यावर ओरडल्या...."इकडे ये म्हणते ना....!" तू केवढा चिडला होतास. केवढ्या जोरात बाईंना म्हणालास, मी 'निख्याशी' बोलतोय दिसत नाही का तुम्हाला?" माझ्याशी बोलताना कसलाही डिस्टर्बन्स सहन न होणारा तू... आज कुणाच्यातरी बोलावण्यावरुन चक्क मला लिहीत असलेले पत्र अर्धवट टाकून जातोयस......

मला तुझी काळजी वाटायला लागलीये चेत्या. लवकर काय ते कळव. काही प्रॉब्लेम आहे का? मी येऊ का तिकडे? नाही...मी येतोच , तू पत्ता पाठव तुझा!

तुझा
निख्या....

ता.क. : ति.स्व. बाबा बरे आहेत रे. थकलेत आता. पण ठीक आहे. वयोमानानुसार तेवढे होणारच. तू आईबद्दल काहीच लिहिले नाहीस आणि रेश्मा...?
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.