माझा (वि)चित्रकलेचा प्रवास !- भाग २

पाचवीपासून पेठे विद्यालयात आम्हाला चित्रकलेसाठी  एक स्वतंत्र शिक्षक लाभले त्यांचे नाव होते डोंगरेगुरूजी. आमच्या शाळेत चित्रकलेसाठी शेवटच्या मजल्यावर स्वतंत्र हॉल होता. त्या काळी ड्रॉईंग पेपर, ड्रॉईंग-पेन्सिली, ब्रशेस, रंग आदी सर्व आम्हाला शाळेमार्फत मिळायचे. पुढील ५-६ वर्षे खर्‍या अर्थाने काही अंशी तरी चित्रकलेचे ज्ञान तेथेच मला लाभले. तेव्हा मी सरांचा लाडका विद्यार्थी होतो. त्यांनीच आमच्याकडून चित्रकलेच्या दोन्ही परीक्षा देवविल्या होत्या. ह्या सबंध काळात एकदोनदा माझी चित्रे शाळेच्या मुख्य नोटीस बोर्डावर लावली गेल्याचे स्मरते. त्यावेळी शाळेत मिळालेली ही शिदोरी मला आज पर्यंत  पुरली आहे.

 १९५८ मध्ये अकरावी मॅट्रिक झालो व घरात पुढे मी काय शिकायचे ह्या प्रश्नावर खल सुरू झाला. वडिलांनी तर स्पष्टच सांगून टाकले, नाशकात शिकणार असशील तरच  मी भार उचलीन अन्यथा तू कर्ज काढून शिकावेस ! नाशकात त्याकाळी एकच कॉलेज व तिथे तीनच शाखा होत्या. जे जे ला मी जावे असे एका भावाच्या मनात होते पण ते प्रकरण खर्चीक होते व पुढे काय? शाळा मास्तरच व्हायचे ना? म्हणून तो विचार बारगळला. हो, ना, करता करता आमची वर्णी पुण्याच्या पॉलिटेक्निकला इंजिनीअरिंगच्या डिप्लोमाला लागली. नंतर कालांतराने डिप्लोमा व मग नोकरी आणि मग लग्न अन संसार. तो पर्यंत शाळेत मिळालेल्या शिदोरीवर आपले आपणच प्रदर्शने पाहायची व घरी येऊन  प्रयोग करायचे असा क्रम चालू ठेवला होता.

 त्याच काळात म्हणजे १९६०-६५ मध्ये पुण्यात रांगोळीची प्रदर्शने भरायची, अश्याच एका ग्रुपमध्ये मी ही शिरकाव करून घेतला. त्या आमच्या ग्रुपमध्ये आताचे प्रसिद्ध चित्रकार श्री सुहास बहुलकर हेही होते. ते त्यावेळी शाळेत शिकत होते पण आम्हा  सर्वात त्यांची रांगोळी अतिशय सुंदर असायची. मध्यंतरी येथील(पुणे) बालगंधर्व रंग मंदिरात त्यांचे एक प्रात्यक्षिक झाले तेव्हा त्यांना भेटून ही गंम्मत ऐकवली, तेव्हा त्यांच्याही आठवणी ताज्या झाल्या.

त्याच सुमाराला माझा गणपतीकार गोखल्यांशी परिचय झाला. त्यांचा वाडा मी जेथे क्लासला जायचो त्याचे शेजारीच होता. जाता येता निरनिराळ्या गणपतीच्या मूर्ती   मांडलेल्या, रंगवीत असलेल्या दिसायच्या. एके दिवशी हिय्या करून त्यांना भेटायला गेलो. सध्या रंगवणे सुरू आहे तेव्हा सुरवातीला रंगवायला यायला सांगितले. शिरकाव तर झाला होता. हळू हळू ते काय काय करताहेत ते बघून एकेदिवशी चक्क बोहोरी आळीतून दोन किलो शाडूची माती आणली. या आधी कणीक कोणी मळली होती ? मग  कधी पाणी जास्त... मग घाल माती अधिक असे करीत करीत मी मूर्तीही करायला लागलो ! चित्र काढणे ही द्विमिती झाली. पण त्रिमिती कळणं हेही त्यात महत्त्वाचे असतेच त्या दृष्टीने चित्रकलेसाठी हाही  अभ्यास उपयुक्त होताच.
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.