काळरात्र ! - भाग २

“चालत गेलात तर वेस्टर्न एक्सप्रेसने जा आणि हयात हॉटेलच्या सिग्नलला उजवीकडे वळा. कलिनामार्गे तुम्ही घाटकोपरला पोहचाल. २ तास तरी लागतील”.

तिघांनी विचार केला. आता ८ वाजलेत चालत निघालो तर रात्री १०-१०.३० पर्यंत घाटकोपर. ठरलं.. आम्ही चालत जाण्याचा निर्णय घेतला.

पावसाचा जोर आहे तसाच होता. आम्ही चालत वेस्टर्न एक्सप्रेसला आलो. आतापर्यंत गुडघ्याखालील पाण्यात चालून चालून पॅंट पूर्णं खाली भिजली होती. वेस्टर्न एक्सप्रेसला पाहतो तर जवळ जवळ ३००-४०० माणसं चालत चालली होती. त्यांच्या मागोमाग मी, तो मुलगा आणि मुलगी चालत होतो. बोलता बोलता कळलं की तो मुलगा..भूषण मुंबईमध्ये २ महिन्यापूर्वी आलेला आणि नुकताच दादरला नोकरीला लागलेला. ती मुलगी.. सीमा .. दादरला कॉलेजला होती आणि तिचे पप्पा पोलिसामध्ये कामाला आहेत. त्यात ती सारखी चिंतेत होती की घरी व्यवस्थित पोहचेल की नाही म्हणून.. मी माझा मोबाईल तिला दिला आणि घरी कळव म्हणून सांगितले. त्या हौसेच्या मोबाईलने तेव्हा टांग दिली. सगळं नेटवर्क जॅम झालं होतं. कोणालाच फोन लागत नव्हते. झालं.. ती रडायला लागली. आम्हा दोघांना ही चिंता की ही व्यवस्थित पोहचली नाही तर तिचा पोलिसबाप आपल्याला काही सोडणार नाही...

आम्ही किती चाललो हे कळत नव्हते. कधी गुडघाभर पाणी तर कधी कमरेपर्यंत. त्या पाण्यातून चालून चालून पाय खुपच दुखू लागले होते आणि गेले ४ तास हातात धरलेल्या त्या छत्रीमुळे हात पार कामातून गेले होते.

एका हातातून दुस-या हातात छत्री घेतली आणि अवघडलेला हात सरळ करताना मी रडायचाच बाकी होतो. रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुकानेही बंद. त्यामुळे खायलाही काही मिळेल याची शंका होती. चालता चालता आम्हाला एक उड्डाणपूल लागला. एकाला विचारले तर कळलं या पुलाखालून गेलं की कलिनाला जाता येतं. पुलाखाली बर्‍याच गाड्या पाण्यामध्ये बुडलेल्या दिसल्य़ा. त्यावरून पाण्याची पातळी समजत होती. आम्ही पुलावर न चढता खाली गेलो, पण पुलाखालून पाण्याचा लोंढाच लोंढा वाहत होता. जशी की मिनी नदीच होती ती. पुलावरून पलीकडे जाऊन तिकडून काही जमतं का ते पाहू असा विचार करून आम्ही पुल चढून पलीकडे गेलो. पुल पुर्णपणे गाड्यांनी आणि माणसांनी भरलेला होता. कारण तिच एक जागा पाण्याखाली नव्हती. पुल ओलांडून दुस-या टोकाला आलो. तिकडेही पाण्याचा जोरदार प्रवाह पुलाला वळसा घालून पुलाच्या खाली जात होता. त्या पाण्यातही एक जोडपं पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतं. एव्हाना रात्रीचे ११.३० वाजले होते. भूषण आणि सीमाला म्हटलं की या पाण्यात उतरण्यात धोका आहे. पुलापलीकडेही जाता येत नाही तेव्हा पुलावरच थांबू. प्रश्न हा होता की थांबायचं कुठे??
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.