मावशीचें घर ! - भाग ३

आणि सहा महिन्यानंतर सहकारी संस्थेचा सदस्य हो. म्हणजे कधीं गरज पडली तर कर्ज घेऊं शकशील. फक्त वाटेल त्याला जामीन राहूं नकोस. बचत खातें नेहमीं जॉईंट असावें आणि आयदर ऑर सही ठेवावी. म्हणजे आपण गांवीं गेलों असलों वा आजारी पडलों तर गैरसोय होत नाहीं. लग्नापूर्वीं आई जोडखात्याची धारक असावी आणि लग्नानंतर पत्नी. त्यांचा अनुभव, योग्य आणि परखड मार्गदर्शन यामुळें आम्हांला तसेंच बॅंकेतल्या खातेदारांना त्यांचा फार आधार वाटे. लग्नें जुळवणें, लग्नाचीं बोलणीं करणें आणि वाद सोडवणें या त्यांच्या खास आवडीच्या गोष्टी. त्यांच्या छाप पडणार्‍या व्यक्तिमत्त्वामुळें त्यांच्या शब्दाचा मान राखला जाई. हुंडा अजिबात मागायचा नाहीं. वधूपिता प्रेमानें जें कांहीं देईल तें स्वीकारणार असाल तरच बैठकीला येईन असें ते वरपक्षाला अगोदरच बजावून ठेवत. अशी पुरोगामी आणि सेवाभावी वृत्ती. मावशीच्या अगोदरच ते फारसा शारिरिक त्रास न होतां वार्धक्यानें बहुधा ऐंशीच्या वयांत गेले.

मावशीच्या घरीं माझी खरी गट्टी जमली ती हेमाशीं. हेमा माझ्यापेक्षां सहाएक महिन्यांनीं मोठी. हेमा, अरुणा आणि मीं. आमचें त्रिकूटच होतें. हेमा-अरुणांनींच मला ‘च’ ची चषाभा शिकवली. हेमा, अरुणा, मीं, अशोक माळी आणि श्रीराम शेट्टी आम्हीं इतर मुलांपेक्षां वयानें आणि आकारानें लहान होतों. म्हणून मोठीं मुलें आम्हांला सहसा खेळायला घेत नसत. कधीं घेतलें तर कच्चा लिंबू म्हणून. मग आम्हीं लंगडी खेळत असूं. लंगडी, रुमाल टाकी, गाण्यांच्या भेंड्या, संत्रे लिंबू वगैरे खेळ खेळत असूं. कधीं वाडींतली आणखी मुलें मुली, त्यांच्याकडे पाहुणे आलेलीं मुलें मुली खेळायला येत व खूप मुलें होत. मग दोन चमू पाडून खेळ होत. मग दोन कप्तान म्हणून सर्वांत लहान वा सर्वांत मोठीं मुलें होत. ते सोडून इतर खेळाडूंना विशिष्ट नांवें ठेवत. कधीं फळांचीं, कधीं फुलांचीं, कधीं झाडांची, कधीं भाज्यांची. मग हे नांवें ठेवलेले खेळाडू त्या कप्तानांना विचारत

आला आला गाडा.

मग ते कप्तान विचारत ‘कशाचा’

मग सगळे बोलत ‘हळदी कुंकवाचा’

मग ते सांगत ‘नांव फोडा’

मग सगळे सांगत कोणी घ्या अमुक कोणी घ्या तमुक असें करून सगळीं नांवें सांगत.

मग कप्तान एकेक नांव घेत. मग त्या नांवाचा भिडू त्या कप्तानाच्या मागें उभा राही. अशा तर्‍हेनें दोन चमू पाडून खेळ होत. संध्याकाळ कधीं सरे पत्ता लागत नसे. आयुष्यातले सोनेरी क्षण वेचून बाजूला काढायचें झालें तर ते खेळातले क्षण नक्कीच निघतील. नंतर मी पांचवीत गेल्यावर जसें आजोबांकडे जाणेयेणें कमी झालें तसें मावशीकडेहि. पण दिवाळींत रतन अरुणा फराळ देऊन गेल्यावर सरू हेमा नाहींतर बाळादादा किंवा विदू म्हणजे विद्याधर न चुकतां येऊन जात. मावशी मात्र सहसा बाहेर कुठें जातयेत नसे.
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.